
॥ श्री ॥
कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत
मार्गशीर्ष शु.८, शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी यांच्या पुण्यतिथीचा महोत्सव ‘जय पॅलेस’ सभागृह, कोल्हापूर येथे मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच साधकांचे आगमन होऊ लागले होते. सभागृहामध्ये अनंतकोटिब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी, प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज, प.पू.सद्गुरु सौ.ताई महाराज व श्रीसद्गुरु परंपरेच्या प्रतिमा मुख्य व्यासपीठावर विराजमान होत्या. अत्यंत सुरेख व सुबक रीतीने केलेली पुष्पसजावट वातावरणाच्या प्रसन्नतेत अधिकच भर घालत होती. साधक व अभ्यासू वाचकांकरिता ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांचा तसेच ‘अमृतबोध’ मासिकांचा असे दोन्ही स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्याचबरोबर श्रीक्षेत्र आंबेरी येथील सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.
संक्षिप्त चलतचित्र
शुक्रवारी २८ तारखेला सकाळी ठीक ७ वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या पावन उपस्थित सामुदायिक साधनेने कार्यक्रमांना सुरुवात झाली. साधनेनंतर अल्पोपाहार होऊन ९ ते १०.३० या वेळेत ह.भ.प.कु.अमृता करंबेळकर यांच्या कीर्तनसेवेस आरंभ झाला.
या वर्षी देखील उत्सवसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘जय पॅलेस’ सभागृहाचे मालक श्री.जी.टी.पोवार व त्यांची पत्नी यांचा तसेच महोत्सवात साधकांकरिता अल्पोपाहार व महाप्रसाद यांची चोख व्यवस्था ठेवणारे आचारी श्री.राहुल चौधरी यांचाही प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पू.श्री.दादा महाराज रोटीथोर यांच्या कन्या आणि उत्तराधिकारी असणाऱ्या पू.सौ.स्नेहलताई कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या. त्यांचाही प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते शाल व श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या कोल्हापूर केंद्रातर्फे ज्येष्ठ साधक दांपत्य श्री. चंद्रकांत व सौ.मीरा डोंगरकर यांनी सद्गुरुपूजन केले व साधक भगिनींनी प.पू.सद्गुरु श्री.दादांना औक्षण केले.
सकाळी ठीक ११ वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेस आरंभ झाला.
श्री एकनाथी भागवताच्या सव्विसाव्या अध्यायातील तीनशे सोळा क्रमांकाची ओवी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सेवेसाठी घेतली होती. प.पू.सद्गुरु मातुःश्रींच्या विभूतिमत्त्वाशी तंतोतंत जुळणारी अष्ट लक्षणे सांगणारी ही ओवी मुद्दाम सेवेस घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘गुण’ आणि ‘लक्षण’ यांतील भेद स्पष्ट करताना ते म्हणाले की, ‘‘जीवाच्या सापेक्ष विचार होत असेल तर ते गुण; मात्र सृष्टिसापेक्ष होणारा विचार लक्षणे दर्शवितो. ज्याच्या ठायी केवळ भगवत्प्रेमच आहे, विषयवासनांप्रति कमालीची उदासीनता आहे; अशाच जीवांमध्ये अशी लक्षणे दिसतात !’’ पुढे त्यांनी ही आठ लक्षणे कोणती ? अवतारी महात्म्यांच्या व सद्गुरूंच्या ठिकाणी ती कशी अनुभवास येतात ? तसेच साधक किंवा सामान्य जीव म्हणून आपण यातून काय शिकवण घ्यावी ? व ती कशी आचरणात आणावी ? हेही त्यांनी त्या वेळी स्पष्ट करून सांगितले.
‘‘सुख व दुःख यांची बाधा न होता, चित्त नेहमी श्रीभगवंतांच्या चरणीं स्थिर राहणे ही खरी ‘निरपेक्षता’ आहे. प्राणावर संकट आले तरी क्षुब्ध न होणे, अंतरीची शांती न ढळणे हीच ‘प्रशांतता’ आहे. अखंड साधनारत राहिल्यास अशी शांती प्राप्त होऊ शकते. ती आतून टिकून राहिली तरच सर्व विश्व हे ब्रह्मस्वरूप आहे असे दिसणारी दृष्टी प्राप्त होते. यालाच ‘समदृष्टी’ असे संबोधलेले आहे !’’ असे त्यांनी सांगितले. ‘निरपेक्षता’, ‘प्रशांतता’ व ‘समदृष्टी’ ही लक्षणे प.पू.सद्गुरु मातुःश्रींच्या चरित्रातील अनेक प्रसंगांतून कशी दिसून येतात हे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले. पुढे ‘निर्ममता’ व ‘निरभिमानता’ या लक्षणांचा एकत्रित विचार करताना त्यांनी सांगितले की, ‘‘परमार्थातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार होय. ‘मी’ व ‘माझे’ यातून मोह उत्पन्न होतो व तोच पुढे अहंकारास वाढीस लावतो. सद्गुरूंच्या ठायी मात्र कमालीचे वैराग्य दिसून येते !’’
‘अपरिग्रह’ या पुढील लक्षणाच्या संदर्भात प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी असे स्पष्ट केले की, आपण स्थूल वस्तूंचा, कर्मांचा, आचार व विचार यांचा अशा अनेक प्रकारे परिग्रह करीत असतो. ‘अपरिग्रही’ म्हणजे ‘या चारही गोष्टींचा परिग्रह न करणारा’. श्रीमद् भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायात येणाऱ्या ‘गृहस्थी’ व ‘अपरिग्रही’ या शब्दांचा गूढ अर्थ या प्रसंगी त्यांनी उलगडून सांगितला. येथे ‘अपरिग्रही’ याचा अर्थ ‘कोणावरही अवलंबून नसणारा’, ‘एकटा’ अर्थात् ‘परब्रह्मस्वरूप झालेला’ असा आहे.
‘‘आपल्या परंपरेतील सर्वच सद्गुरु महात्मे या लक्षणांनी परिपूर्ण आहेत. ही सर्व ज्ञानाचीच लक्षणे आहेत. साधकांनी देखील नित्य साधन केल्यास, परमार्थात झडझडून प्रयत्नशील राहिल्यास, संतांना व श्रीसद्गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा केल्यास त्यांना या गुणांचा लाभ होऊ शकेल !’’ असे त्यांनी सांगितले.
निरूपणादरम्यान प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘श्रीस्वामीतनया’ या प.पू. सद्गुरु सौ.ताई महाराजांनी लिहिलेल्या प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवींच्या चरित्रग्रंथाचा वारंवार उल्लेख केला. ‘‘हे लघुग्रंथरूपी चरित्र आजच्या काळात समाजासाठी ‘Benchmark For Parenting’ (पालकत्वाचा आदर्श) व ‘Lifestyle guide’ (जीवनशैली मार्गदर्शक) आहे. तसेच ते साधकांसाठी परमार्थ सुकर करून सांगणारे आहे; म्हणून सर्वांनी ते पुस्तक अवश्य वाचावे व पुनःपुन्हा अभ्यासावे !’’ असे त्यांनी सांगितले.
शेवटी, ‘‘चिकाटीने साधन करण्याची इच्छा सर्व साधकांना होवो !’’ अशी प्रार्थना सद्गुरुपरंपरेच्या श्रीचरणीं करून प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी प.पू.सद्गुरु मातुःश्रींच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने झालेली प्रवचन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली.
अत्यंत रसाळ व बहारीच्या अशा या प्रवचन-सेवेनंतर ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा नामजप करण्यात आला. तसेच आरती व मंत्रपुष्प होऊन पुण्यकाल साजरा करण्यात आला. आरती आणि मंत्रपुष्पानंतर सर्व साधकांनी श्रीसद्गुरुदर्शनाचा लाभ घेतला. त्या योगे सर्वांनी अंतःकरणात अपार समाधान अनुभवले. महोत्सवानिमित्त उपस्थितांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
प.पू.सद्गुरु मातुःश्रींच्या श्रीचरणीं वारंवार नतमस्तक होऊन, त्यांच्या शिकवणीनुसार सतत साधनरत राहण्याचा निश्चय करीत साधकजन आपापल्या मुक्कामी परतले व त्यानंतर या सुनियोजित महोत्सवाची सांगता झाली.
उत्सवातील काही क्षण चित्रे
